भोर संस्थान

इतिहास

संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवाजीच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजीच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).
नारो शंकर (१७०७-१७३७)

शंकराजीपंत समाधिस्थ झाल्यानंतर शाहूनें त्याचा अज्ञान पुत्र नारोपंत यास सचीवपदाचीं वस्त्रें देऊन हे संस्थान आपल्या बाजूचें करून घेतलें. नारोपंत अल्पवयी असल्यामुळें त्याची मातोश्री येसूबाई व त्याचा मुतालिक हीं दोघें राज्याकारभार चालवूं लागलीं. येसूबाई चांगली कर्ती असून तिचें आपल्या अंमलदारावर वजन होतें. न्यायाच्या कामीं ती कोणाचीहि भीडभाड धरीत नसे. नारोपंताच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडल्या नाहींत. दमाजी थोरातावर शाहूनें याला पाठविलें असतां दमाजीनें याचा पराभव करून याला बंदींत ठेवलें. त्याला पुढें बाळाजी विश्वनाथानें सोडविलें, त्याबद्दल येसूबाईनें बाळाजीस पुणें परगणा व पुरंधर किल्ला दिला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीं असलेल्या बेलसर गांवच्या एका रामोपासक कुळकर्ण्यानें श्रीरामाच्या मूर्ती त्यास चैत्र शु. ८ च्या दिवशीं आणून दिल्या व तेव्हांपासून भोरास रामनवमीचा उत्सव सुरू झाला. नारोपंताच्या वेळीं शाहूनें साहोत्राबाब सचिवास वंशपरंपरा वतनी करून दिली.
चिमणाजी नारायण (१७३७-१६५७)
नारोपंतास पुत्र नव्हात. त्यानें दत्तक पुत्र घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. आजपर्यंत सचिवांचें राहण्याचें ठिकाण नेरें होतें. तेथील वाडा जळाल्यानें चिमणाजीनें इ. स. १७४० त भोर हें राजधानीचें ठिकाण केलें. पेशव्यांनीं याला तुंगतिकोना देऊन त्याऐवजीं सिंहगड किल्ला घेतला. चिमणाजी पेशव्यांच्या विरूद्ध वागत असे.
सदाशिव चिमणाजी (१७५८-१७८७)
हा चिमणाजीचा औरसपुत्र. यानें संस्थानचा ३० वर्षें उपभोग घेऊन तो १७८७ सालीं निवर्तला. हा निपुत्रिकच होता.
रघुनाथराव चिमणाजी (१७८७-१७९१)
सदाशिवपंत निपुत्रिक वारल्यामुळें त्याचा सख्खा धाकटा भाऊ रघुनाथ चिमणाजी सचीवपदाचा वारस झाला. याचा शंकरराव उर्फ बाबासाहेब नांवाचा पुत्र पुढें गादीवर बसला.
शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)
याच्या कारकीर्दीत म्हणण्यासारख्या गोष्टी घडल्या नाहींत. याला पुत्रसंतान नव्हतें. हा १७९८ सालीं वारला. तेव्हां त्याचा दत्तक पुत्र चिमणाजीपंत हा गादीवर आला शंकररावाच्या अंगीं विशेष कर्तबगारी नव्हती; तो जरा भोळसट होता. त्याच्यावर देखरेख ठेवण्याकरितां नाना फडणविसांनीं बाजीराव मोरेश्वर याची योजना केली होती. हा मनुष्य हलकट व क्रूर होता. यानें शंकररावास जवळ जवळ बंदीवासांत ठेविलें होतें. त्याच्या हातून शंकररावाची सुटका महादजी शिंदे यानें केली. बाजीरावानें एकदां शंकरराव कुटुंबासह जेजूरीस असतां त्याचा घात करण्याकरितां मारेकरी पाठविले होते. शंकरराव सखारामबापू बोकीलचा जांवई होय. रामशास्त्री न्यायाधीशाची मुलगी शंकररावाची दुसरी बायको होती.
चिमणाजी शंकर (१७९८-१८२७)
हे गादीवर आल्यावर थोड्याच दिवसांत त्यांचें व त्यांची सापत्न मातोश्री राधाबाई हिचें वैमनस्य आलें. बाईनें आप्पा निंबाळकराची मदत घेऊन त्याच्या अरबांकडून चिमणाजीस कैदेंत ठेवविलें. चिमणाजी ८।९ महिने कैदेंत होता. बाई बरीच कारस्थानी होती. तिनें पंतावर अनेक संकटें आणलीं. शेवटीं तिनें चालविलेली बंडाळी मोडून पेशव्यांनीं पंतांस कैदेंतून सोडवून बाईला (१८१५ सालीं) रोहिड किल्ल्यावर ठेविलें. तेव्हांपासून पंताचा कारभार सुरळीत चालू झाला. या वेळेपासून पेशवाईअखेर पंत पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा रावबाजीबरोबर टेंभुर्णींपर्यंत गेला होता. परंतु पुढें एल्फिन्स्टनचा म्हणण्यावरून आपलें संस्थान कायम ठेवण्यासाठीं पंतानें रावबाजीस सोडून इंग्रजांशीं तह केला. त्यांत पंताची मोंगलाईंतील ५०।६० हजारांची साहोत्राबाब मात्र गमावली गेली. पुढें राधाबाईला दरमहा थोडीशी नेमणूक करून देण्यांत आली. ती माहुलीस जाऊन राहिली. नंतर तिनें तीर्थयात्रा केल्या. तिच्याच पैशांतून भोराजवळील विश्रामघाट (अंबाड खिंड) बांधण्यांत येऊन अन्नसत्र चालू आहे. चिमणाजीपंतास पुत्र नसल्यामुळें त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव रघुनाथ ठेविलें. चिमणाजीपंत १८२७ सालीं वारला.
रघुनाथ चिमणाजी (१८२७-१८३६)
याच्या कारकीर्दीत सचिवाचा कोंकणांतील पसरलेला कांहीं भाग एकत्र करण्याकरिता १८३० सालीं इंग्रजांनीं सचिवाबरोबर तह करून त्यांच्या मुलुखाचा मोबदला करून दिला. याला पुत्रसंतान नव्हतें म्हणून त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. रघुनाथपंत अज्ञान असतां त्याचें व त्याच्या आईचें भांडण लागलें. तें सातारच्या प्रतापसिंहानें मोडून भवानीबाईस नेमणूक करून दिली. ही बाई अखेरपर्यंत सात-यास होती.
चिमणाजी रघुनाथ (१८३६-१८७१)
हा लहान असतां, याच्या आईनें सातारकर प्रतापसिंहाच्या विरूद्ध शहाजीस (प्रतापसिंहाचा भाऊ) मदत केली होती. त्यामुळें शहाजीनें चिमणाजीस नजर वगैरे माफ केली. सातारचें राज्य बुडाल्यावर सचीव इंग्रज सरकारचे मांडलिक झाले. चिमणाजीपंतानें संस्थानची स्थिति बरची सुधारली व संस्थानचें बरेंच कर्ज फेडलें. चिमणाजीस शंकरराव नांवाचा पुत्र स. १८५४ त आला. यावेळीं औरस संतति नसेल तर संस्थानिकास दत्तक घेण्याची परवानगी नव्हती. चिमणाजीपंतानें भोर येथें स. १८६३ मध्यें रामबागच्या ओढ्यास धरण बांधून त्याचें पाणी नळानें गावांत आणलें. त्याचप्रमाणें त्यानें भांबवडीबाग, नवीन राजवाडा, त्याजवळचा बाग, नीरानदीचा मोठा घाट, शहरातील सडक इत्यादि कामें करून भोर शहरास शोभा आणिली व संस्थानांत जागजागीं नवीन इमारती बांधल्या. पोलिसखातें उभारून तालुक्याच्या ठिकाणीं मामलेदार, मुनसफ वगैरेंच्या कचे-या स्थापन केल्या. याच्या कारकीर्दींत शिक्षणकार्यास मात्र आरंभ झाला नाहीं. त्यांनीं रामनवमीच्या उत्सवाची उत्तम शिस्त लावली.
शंकरराव चिमणाजी उर्फ रावसाहेब (१८७१-१९२२) 
रावसाहेबांची कारकीर्द सुमारें ५० वर्षें झाली. शंकरराव तापट, करारी, निरलस, बुद्धिमान, व नियमित रहाणीचे असे होते. त्यांचीं दोन लग्नें झालीं. त्यांनीहि अनेक सुधारणा करून संस्थानचा दर्जा वाढविला. सडका, चावड्या, धर्मशाळा, विहिरी ब-याच ठिकाणीं बांधिल्या. शिक्षणखातें निर्माण करून भोर येथें हायस्कूल स्थापन केलें, व संस्थानांत सुमारें ६० प्राथमिक शाळा सुरू केल्या, आणि भोर येथें एक मोफत दवाखाना सुरू केला. रामनवमीचा उत्सव निरंतर चालण्याकरितां रावसाहेबांनीं वार्षिक ३०,००० रूपये उत्पन्नाचे २८ गांव अलग तोडून दिलें. याप्रमाणें प्रत्येक देवस्थानची त्यांनीं स्वतंत्र व्यवस्था करून ठेविली आहे. सन १९०३ मध्यें त्यांनां ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. व पुढें १९११ सालीं आणखी दोन तोफांच्या सलामीचा मान व हिज हायनेस ही पदवी मिळाली. दिल्लीस नरेन्द्रमंडळ स्थापन होईपर्यंत राजमंडळाची जी सभा भरत असे त्या प्रत्येक सभेस रावसाहेबांनां निमंत्रण येत असे व प्रत्येक सभेस हजर रहात असत.
रावसाहेबांची धर्मावर फार श्रद्धा असून त्यांनीं हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व तीर्थयात्रा सहकुटुंब केल्या. काश्मीर, ग्वाल्हेर, बडोदें, कोल्हापूर, म्हैसूर, हैद्राबाद, त्रावणकोर इ. मोठ्या संस्थानिकांच्या निमंत्रणावरून तेथें जाऊन शंकररावांनीं त्या संस्थानिकांचा दृढ परिचय करून घेतला. रावसाहेबांच्या पत्नी कै. श्री. सौ. जिजीसाहेब ह्यांनीं एकट्यानींच व बदरीकेदार व नारायणाची बिकट यात्रा केली. रावसाहेबास प्रथम १८७७ सालीं कन्यारत्न झालें. व दुस-याच वर्षी म्हणजे १८७८ सालीं पुत्ररत्न झालें. त्याचें नांव त्यांनीं रघुनाथराव उर्फ बाबासाहेब ठेविलें. तेच हल्लींचे संस्थानाधिपति आहेत. खर्च करण्यांत रावसाहेबांचा हात अगदीं काटकसरीचा असे. यामुळेंच त्यांनां संस्थानची आर्थिक स्थिति चांगली ठेवतां आली. रावसाहेब सर्व खात्यांतील कामें स्वतः पहात असत. या त्याच्या एकतंत्री कारभाराचा परिणाम असा झाला कीं, नोकराच्या अंगीं जबाबदारीनें काम करण्याची पात्रता उत्पन्न झाली नाहीं. त्यांच्यांत एकतंत्री कारभारामुळें उत्पन्न होणारे दोष शिरले. महायुद्धनंतर नवीन तत्त्वें, नवीन आकांक्षा उदयास येऊन नवीन वातावरण तयार झालें व त्याच्या लाटा संस्थानीं प्रजेवर आदळून जागृति उत्पन्न झालीं, यामुळें रावसाहेबांचीं अखेरचीं २।३ वर्षें फार त्रासांत गेलीं. रावसाहेबांची सर्व कारकीर्द एकतंत्री राज्यकारभारांत गेली असल्यामुळें पालटलेल्या स्थितींत प्रसंगानुरूप धोरण बदलण्याचें जें एक प्रकारचें कौशल्य लागतें तें त्यांच्या अंगीं नव्हतें. प्रजपरिषद निर्माण होऊन राज्य कारभारांत प्रजेचा हात असला पाहिजे, जुलमी कर नाहींसें झाले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या प्रजेकडून होऊं लागल्या. प्रजेंत असंतोष माजत चालला. परंतु रावसाहेबांच्या करारी स्वभावामुळें नवीन मनूस अनुसरून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं बदललें नाहीं. यामुळें असंतोष जास्तच पसरत जाऊन रावसाहेबांनां मनस्वी त्रासहि होऊं लागला. अशा स्थितींतच स. १९२२ सालीं त्यांचें देहावसान झालें. व त्यांचे पुत्र श्रीमंत बाबासाहेब हे राज्यारूढ झालें.
श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव (राज्यारोहण १९२२)
यांचा जन्म १८७८ सालीं झाला. त्यांचा सन १९०५ पर्यंतचा काळ प्रथम पुणें हायस्कूल, नंतर म्याट्रिक झाल्यावर डेक्कन कॉलेजांत पाश्चात्य शिक्षण व कायदेशिक्षण संपादन करण्यांत गेला. नंतर त्यांना संस्थानच्या कामकाजाची माहिती होण्याकरितां त्यांचे वडील रावसाहेब यांनीं त्यांनां शिरवळ तालुक्याचें अ. कलेक्टर व अ. जज्जाचे अधिकार दिले. ते अधिकार उत्तम रीतीनें चालवून त्यांनीं संस्थानच्या कामाची व लोकस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली. हिंदुस्थानांत ब-याच ठिकाणीं प्रवास करून त्यांनीं आपल्या ज्ञानांत भर घातली आहे. जगांत चाललेल्या घडामोडीचें सूक्ष्म निरीक्षण करून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं गादीवर येण्यापूर्वींच आंखून ठेविलें होतें. या प्रकारचें निश्चित धोरण असल्यानें राज्यारोहणसमारंभकाळींच (ता. १८ आगष्ट १९२२) प्रजेंत झालेला असंतोष नाहींसा करण्याकरतां व नोकरांनां संतुष्ट करण्याकरितां श्रीमंत बाबासाहेबांनीं घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर, वगैरे किरकोळ जिनसावरील लायसेन्स-फी माफ केली. संस्थानांतील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलें. आणि जमीनसा-यांत सूट, सर्व नोकर लोकांस बोनस वगैरे देणग्या दिल्या. शिवाय सुधागड तालुक्यांत पाली येथें दवाखाना आणि भोर येथें एक वेदशाळा सुरू केली. हे युवराज असतांनाच त्यांनीं भोर येथें श्रीरामक्रीडाभुवन (प्रथमपत्नीचें स्मारक म्हणून) कै. श्री. सौ. गंगूताई पंतसचीव वाचनालय अशा दोन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांनीं प्रातिनिधिक तत्त्वावर राज्याकारभार चालविण्याचें आपलें धोरण जाहीर करून भोरास लोकमतानुवर्ती म्युनिसिपालिटी स्थापन केली व सभाबंदीचा कायदा रद्द करून प्रजेला आपलीं गा-हाणीं मांडण्याचा मार्ग मोकळा करून दिला. नोकरांनां पगारवाढ करून पेन्शन, ग्र्याच्युटी, भत्ता, यांचें नियम केले आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांस सातारा जिल्ह्यांतील संस्थानिकांनीं आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्रमंडळाकरितां निवडून दिलें आहेत. त्याप्रमाणें ते दिल्लीस १९२४ सालीं गेले होते. जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षांची तक्रार असल्यामुळें फारेस्टचौकशीकमेटी व हिरडाचौकशी कमिटी अशा दोन कमिट्या त्यांनीं नेमिल्या आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांचें हल्लींचें द्वितीय कुटुंब सौ. लक्ष्मीबाईसाहेब या सुशिक्षित, सुशील प्रजावत्सल व स्त्रीशिक्षणाभिमानी आहेत. श्रीमंत बाबासाहेब यांनां हल्लीं प्रथम कुटुंबापासून एक व द्वितीयाकुटुंबापासून दोन असे ३ पुत्र आहेत; पहिल्या कुटुंबापासून झालेले युवराज श्री. भाऊसाहेब हे सन १९२४ सालच्या म्याट्रिक परीक्षेंत पास होऊन उच्च शिक्षणाकरितां डेक्कन कॉलेजांत शिकत आहेत.


इंग्रजांच्या काळात संस्थाने विलीन झाली आणि संस्थानांच्या ऐश्वर्याला व रूबाबाला उतरती कळा लागली. इंग्रजांच्या राहणीमानाचा प्रभाव संस्थानिकांनी तर फार अल्पकाळात अंगी रुजवला. त्यामुळे परंपरा व पाश्चिमात्य पगडा यांचे एकत्र रूप त्यांच्या राहणीमानातून व वास्तूकलेतून दिसून येते. पुण्यापासून जवळ औंध, सांगली, फलटण, जमखिंडी अशा संस्थानांचा वारसा अनेक कलाकृतींमधून जिवंत आहे. पुण्यापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर भोर संस्थानचं वैभव अजूनही वास्तुरूपानं सांभाळलेलं आहे.
भोरचा राजवाडा उभा आहे. राजवैभव जरी सरलं तरी त्या काळाच्या ऐश्वर्याची व उच्च अभिरूचीची कल्पना वास्तूच्या अंतर्बाह्य रूपातून प्रतीत होते. ब्रिटीश सरकारच्या संस्थान खालसा धोरणामध्ये, हे एकमेव असे संस्थान होते ज्याला ब्रिटीश सरकार खालसा करू शकले नाहीत.
२०१० मध्ये राजवाड्याच्या वास्तूला १४१ वर्षे पूर्ण होत आहेत. राजवाड्याची पुनर्बांधणी ही इंग्रजांच्या काळात आल्यामुळे साहजिकच पेशवेकालीन शैली व व्हिक्टोरियन शैली यांची रसमिसळ वास्तुकलेमधून दिसून येते. चार मजली राजवाड्याचे क्षेत्रफळ सुमारे ४४ हजार चौरस फूट आहे. अप्रतिम लाकूडकाम, दगडकाम, वीटकाम यांचा मिलाफ वाड्याच्या वास्तुशिल्पामधून दिसून येतो. तीन चौकी प्रशस्त वाड्याची जमिनीवरील व्याप्ती इंग्रजी एलअक्षराप्रमाणे आहे. पूर्वाभिमुख वाड्याचे प्रथमदर्शनी रूप मोठे वेधक आहे. नगारखान्यासहित लाकूडकामातील महिरपींनी परिपूर्ण असे प्रवेशद्वार भव्य जरी असले तरी वाड्याच्या आकारमानाच्या तुलनेत सौम्य व पेशवेकालीन शैलीप्रमाणे अनुरूप आहे. त्यामध्ये प्रमाणबद्धता व लाकूडकामाच्या कारागिरीची सुबकता नजरेत भरते. प्रथम चौकात प्रवेश केल्यावर पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीची कलाकृती दिसून येते. उंच जोत्यासाठी पाय-यांची रचना, उभे खांब यातून रूबाबदार प्रवेशद्वाराची प्रतिमा अनुभवास येते.

दुस-या चौकात प्रवेश केल्यावर मात्र वास्तुकलेचे नजर विस्फारणारे रूप दिसते. दुमजली चौकाच्या मध्यभागी दुप्पट उंचीचा दरबाराचा भव्य शामियाना ही क्वचितच दिसणारी संरचना आहे. एकसंघ लाकडातील दुप्पट उंचीचे खांब, महिरपी आणि शामियान्याच्या बाजूने चौकात झिरपणारा प्रकाश चौकाचे सौंदर्य द्विगुणीत करतात. शामियान्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये ओस-या, पहिल्या मजल्यावरून नक्षीदार कमानीची गॅलरी शामियान्याच्या सौंदर्यात भर घालतात. ओस-यामधील गुळगुळीत जमीन ही चुन्यामध्ये बाभळीच्या बिया घोटून तयार केली आहे व अनेक दशकांनंतरही ती शाबूत आहे. दक्षिणेकडील चौकाभोवती राहण्यासाठी दालने, स्वयंपाकघर व भोजनघर आहेत. चौकामध्ये उघडणा-या कमानीच्या खिडक्यांमुळे दोन्ही मजल्यांवर भरपूर प्रकाश व खेळती हवा यांचा आनंद घेता येतो. तळमजल्यावरील ऐसपैस स्वयंपाकघरात धूर कोंडू नये म्हणून छतामधून अत्यंत कौशल्याने छोटी छोटी धुराडी सामावली आहेत. चार-चार धुराडी असलेल्या या मुदपाकखान्यात एकेकाळी पंचपक्वानांच्या लज्जतदार शाही भोजनावळी घडल्या असतील.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पंतसचिव घराण्याच्या वंशवेलीचा उल्लेख रावसाहेब व्ही. जी. रानडे यांनी भोरचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांच्या कारकीर्दीवर लिहिलेल्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. घराण्याचा इतिहास व रावसाहेबांच्या कारकीर्दीमध्ये घडलेल्या घटनांची, त्यांनी संस्थानासाठी वेळोवेळी केलेल्या सुधारणांची, संस्थानास भेट दिलेल्या पाहुण्यांची तपशीलवार नोंद या ग्रंथामध्ये आहे. संस्थानाच्या विकासासाठी रस्ते, पूल, भाटघर धरण, शाळा, वाचनालय, व्यायामशाळा वेळोवेळी बांधल्या गेल्या. तसेच महात्मा गांधीच्या स्वातंत्र आंदोलनासाठी अनेक वास्तू वापरण्यासाठी दिल्या गेल्या. भोर संस्थानची, पुणे शहरातील जुन्या वास्तूंची अनेक दुर्मीळ छायाचित्रे या ग्रंथामध्ये आहेत. सहाव्या शतकातील नल आणि मौर्य राजवटीपासून या भागाच्या इतिहासाचा मागोवा हाती लागतो. १२ व्या शतकात शीलाहार राजवट, १३ व्या शतकाच्या मध्यापर्यंत देवगिरीच्या यादवांचे राज्य, १३४७ नंतर बहामनी, १४ व्या शतकात अहमदनगरचा मलिक अहंमदपासून मुघलांचा अंमल सुरू झाला. त्यानंतर शिवाजीमहाराजांच्या दरबारी पैठणजवळील गंडापूरचे श्री शंकरजी नारायण गंडेकर यांची प्रथम पंतसचिवपदी नियुक्ती असा उल्लेख आढळतो. तिसरे पंतसचिव श्री. चिमाजी नारायण यांच्या कारकीर्दीत १७४० मध्ये राजवाडा बांधला. १८५८ व १८६९ अशा दोन वेळा लागलेल्या आगीमध्ये त्याचे नुकसान झाल्यामुळे १८६९ मध्ये वाडयाची पुनर्बाधणी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून करण्यात आली. 
पंतसचिव घराण्याच्या नवीन पिढीनेही त्याचे महत्त्व जाणून हा राजवाडा उमेदीनं सांभाळला आहे. दरवर्षी राजवाडयात रामनवमीचा सण मोठया दिमाखात साजरा केला जातो. आजही रामनवमीला गावभोजन असते. त्यासाठी दक्षिणेकडील भागात मोकळे पटांगण राखून ठेवले आहे. या पटांगणाकडील भिंतीमध्ये काही नक्षीदार खाचा ठेवल्या आहेत. या खाचांची अनभिक्षिक्त मालकी हिरव्यागार डौलदार पोपटांच्या थव्याकडे आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील दालने व चौक पार केल्यावर मागील बाजूस भलीमोठी विहीर आहे. विहिरीमध्ये टप्प्याटप्प्याने उतरणा-या काळ्या पाषाणातील पाय-या आहेत. इथला परिसर जलात निवांतपणे पाय पसरून पहुडलेल्या बालकवीच्या औदुंबराची आठवण जागवणा-या वृक्षराजांनी बहरला आहे. शेकडो लोकांचा वावर एकेकाळी असणा-या वाड्याची क्षुधाशांती करणारी विहीर कलात्मकतेने बांधली आहे. पूर्वेकडील पहिल्या मजल्यावरील दालनात सुरुदार खांबांनी बैठक सजली आहे. उत्कृष्ट लाकूडकामातील महिरपी वेलबुट्यांनी सजलेले छत, हंड्या, झुंबरे ही सजावट गतकालीन उच्च अभिरुचीची आठवण जागवतात. तीन चौकाभोवती गुंफलेली राजवाड्याची संरचना प्रत्येक चौकाचं वेगळं वैशिष्टय राखून आहे. उत्कृष्ट प्रतीची लाकडातील कामगिरी व उत्तम प्रतीचे वीट व दगडकामाचे सौंदर्य राजवाड्याच्या संपूर्ण भागात दिसून येते.

मध्यवर्ती चौकामध्ये रामजन्माचा डोळे दीपवणारा सोहळा रामनवमीला साजरा होता. पंतसचिव घराण्याची नवीन पिढी पारंपरिक पोषाखात व परंपरेस अनुसरून या सोहळ्याचे प्रतिनिधित्व करते. पंतसचिव कुटुंबीय रामजन्माची पालखी खांद्यावरून राजवाड्यात घेऊन येतात. लोड-तक्के, जाजमांनी मध्यवर्ती चौक सजवला जातो. तेथे फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामजन्माचा सोहळा पार पडतो. गावातील सर्वसामान्य जनता, पंतसचिवांचे आप्त, मित्रमंडळी वाड्यामध्ये हजेरी लावतात. भजन कीर्तनाचा कार्यक्रमही होतो. फुलांच्या सजावटीने व माणसांच्या वावराने भल्या मोठ्या राजवाड्यात चैतन्य पसरते. वाड्याबाहेर जत्रा भरते. रामजन्मानंतर भोजनगृहात प्रसादाच्या पंगती उठतात.
संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे.